पूर्वी आपल्याकडे सांगायचे आपण सर्वांशी चांगले वागलो की सर्वजण आपल्याशी चांगले वागतात. अजून देखील सांगत असतील, नाही असे नाही पण मला १००% खात्री नाही. कां ?
लहान मुले सुट्टीत वाट्टेल तिकडे खेळायची, कोणाचे तरी लक्ष असणार याची घरच्यांना खात्री आणि परत जावून जावून जाणार कुठे हि भावना पण मनात असायची. थोडक्यात लोकांचा एकमेकां वर विश्वास होता. आता कोणी खाऊ दिले तर घ्यायचे नाही, कोणी जवळ बोलावले तर जायचे नाही. असे करायचे नाही आणि तसे करायचे नाही याची एक मोठी फेरीस्त असते. यात चूक कोणाची? छोटेच कशाला मोठ्यांना ही घरा बाहेर पडताना अनेक सूचना ऐकाव्या लागतात. आपण स्वतंत्र किंवा मोकळे आहोत का आणि नसू तर यात आपला दोष आहे का?
गेल्या आठवड्यात नॉर्वेत मला बस ने प्रवास करण्याचा योग आला. संध्याकाळची वेळ होती. एका लहानश्या गावातून प्रवास सुरु झाला. बस मध्ये बरेच (१०-१२) प्रवासी होते. शेवटी ५ -६ पुरूष चढले. ते आखाती देशातील वाटत होते. रंगाने उजळ होते पण किरीस्ताव नव्हते. केस काळे होते. दाढी वाढलेली होती. प्रत्येकाच्या हातात एक लहान पिशवी होती. बस मध्ये चढायच्या आधी ते सर्व सिगरेटी ओढत खाली उभे होते. त्यांच्या भाषेत हलक्या आवाजात चर्चा चालू होती. हात वारे करणे चालू होते. थोडक्यात काय तर सगळ “फिशी” वाटत होत.
माझ्या प्रमाणेच इतर काही सहप्रवासी त्यांच्या हालचाली वर लक्ष देवून होते. शेवटी बस सुरु झाली. त्यातील काही पुढे बसले आणि काही शेवटी जावून बसले. मधल्या जागा रिकामी असून सुद्धा.
नॉर्वेत वस्ती तुरळक ठिकाणी आहे. जंगल आणि ओसाड भाग बऱ्याच प्रमाणात आहे. त्या दिवशी प्रवासात माझे काही लक्ष लागेना. नेहमी निसर्ग पाहणारी मी पण काही बघणे झाले नाही. दिसत असून बघितले नाही. राहून राहून शंका वाटत होती. त्या लोकां कडे लक्ष जात होते. साधारण ४५ मिनिटे प्रवास झाल्या वर बसला फेरी वरून पाणी ओलांडावे लागणार होते. येथे असे बरेच भाग आहेत जिथे पाण्यावर पूल नाही तर दळणवळण साठी फेरीची सोय आहे. मोठ्या फेऱ्या माणसे आणि वाहने एका बाजूने दुसऱ्या बाजूला नेतात. ते पाणी ओलांडायला फेरीला २० मिनिटे लागणार होती अशी सूचना मिळाली. तेंव्हा मी वाऱ्यासाठी बस मधून उतरले. माझ्या सोबत ते सर्व जण बस मधून बाहेर आले. दोघा दोघाच्या गटात ते फिरू लागले. विशेष म्हणजे ते एकत्र नव्हते. ती वीस मिनिटे शंका कुशंकेत गेली. त्यानंतात अर्ध्या तासाने बस एक अतिशय लहानश्या गावात आली. वस्ती म्हणाल तर खूप कमी. बस थांबायच्या आत एक माणूस चालक कडे गेला आणि काही बोलला. मग मागे येवून साथीदारांना काही सांगू लागला. बस थांबल्या वर कळायच्या आत ती माणसे खाली उतरी सुद्धा. जसे आले तसेच गेले.
“precaution is better than cure” हे वाक्य राम नामा सारखे ऐकतो. पण या मुळे होते काय? आपण आपले मानसिक स्वात्रंत्र पण घालवून बसलो आहोत. त्यात भरी ला दूरदर्शन आणि वृतपत्र आहेच. समाजातील चांगल्या गोष्टी आपल्या पर्यंत पोचतात का माहित नाही पण समाज सुरक्षेच्या नावा खाली घाबरवून सोडणाऱ्या बातम्या मनात घर करून राहतात. त्याचा परिणाम? आज एकमेकांवर विश्वास ठेवणे कमी झाले आहे.
त्याचा परिणाम मी माझ्या प्रवासाचा तो काळ मनावर दडपण ठेवून केला. सुंदर निसर्ग असून सुद्धा मी भीती खाली होते. खरे तर मी कपाळाला हात लावला, लाज वाटली म्हणा हवे तर. आपण किती दूषणे मनात साठवून ठेवतो हे जाणवले. माणसांचे दिसणे, त्यांचे वागणे, त्यांच्या हालचाली मुळे आपण ते बरे कि वाईट याचा शिक्का वेळ न घालवता लावून टाकतो. माझ्या मनातील ही आकसपणाची भावना मी घालवायचे ठरविले आहे.
शुभं भवतु
You must be logged in to post a comment.